hane News : वाहनाच्या धडकेत पडले, हेल्मेट असूनही जबर मार; ठाण्यात कॅडबरी जंक्शनवर दुचाकीस्वाराचा अंत, कुटुंबाचा आधार हरपला
Thane Accident : ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. डोक्यात हेल्मेट असूनही त्यांना जबर मार बसला. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. संतोष भिलारे (४९) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते ठाणे पालिकेतील विविध कामांसाठी कंत्राटदार म्हणून काम करत होते. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शास्त्रीनगर परिसरात राहणारे संतोष रविवारी कामानिमित्ताने दुचाकीवरुन जात असताना कॅडबरी जंक्शन येथे त्यांना वाहनाने धडक दिली. त्यांच्या डोक्यात हेल्मेट असूनही रस्त्यावर पडल्याने त्यांना जोरदार फटका बसला. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
अखेर मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आईवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. गेल्याच आठवड्यात संतोष यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांच्यावर संतोष यांच्या मृत्यूने पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबियांसाठी धक्का
कौटुंबिक प्रपंचात व्यस्त असतानाही नेहमीच संतोषने सामाजिक भान जपले. आईच्या आजारपणाच्या धक्क्यातून ते नुकतेच सावरले होते. त्यातच त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. मात्र तरीही खचून न जाता ते प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असे, प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करत असे. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का असल्याची भावना संतोष यांचे मित्र किरण नाकती यांनी व्यक्त केली.
पालिका वर्तुळात हळहळ
ठाणे पालिकेत कंत्राटदार म्हणून लहान-मोठी कामे करताना संतोष यांनी कोणत्याही पद्धतीने गैरप्रकार केला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून
प्रभाग स्तरावरील अभियंते, कर्मचारी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या निधनाने पालिका वर्तुळातील अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली. दरम्यान, रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दररोज रस्ते अपघातात मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. खड्डे, चालकांचा अती वेग, नियंत्रण सुटणं अशा अनेक कारणांनी अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याचं चित्र आहॆ





















